Shivanand tiwari Criticize Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या निकालांचे आफ्टरशॉक्स आता जाणवू लागले आहेत. एकीकडे भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर सुशील कुमार मोदी यांची बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. बिहारमधील निवडणूक सुरू असताना राहुल गांधी हे सिमला येथे बहिणीच्या घरी पिकनिक करत होते, अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे.
बिहारमध्ये आरजेडीचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या एकंदरीत मानसिकतेवर शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.



